Saturday 21 December 2013

सिंधुस्थानच्या आधुनिक इतिहासातील सहा सोनेरी पाने


'सिंधुस्थान' म्हणून भरतभूमीचा उल्लेख आता-आताच्या भविष्यपुराणातही आलेला आढळतो.


"एतस्मिन्नंतरे तत्र शालिवाहनभूपतीः|
एतस्मिन्नंतरे तत्र शालिवाहनभूपतीः|
विक्रमादित्य पौत्रश्च पितृराज्य प्रपेदिरे|
जित्वा शकान् दुराधर्षान् चीनतैत्तिरीदेशजान् |
बाल्हिकान् कामरूपांश्च रोमजान्खुरजान् शठान्|
तेषाम् कोषान् गृहित्वा च दंड योग्यानकारयत् |
स्थापिता तेन मर्यादा म्लेंच्छाणीया पृथक पृथक | 
म्लेंच्छस्थानम् परं सींधो कृतम् तेन महात्मना |"
-भविष्यपुराण


याचाच अर्थ कि १०००-२००० वर्षांपूर्वीपर्यंत आपण 'सिंधू'/'सिंधुस्थानी' म्हणूनच ओळखले जात होतो. म्हणून हिंदू ही संज्ञा त्या सर्वांना लागू होते ज्यांचा जन्म भारतातील आहे- 'तं वर्षं भारतं नाम भारती यत्र संततीः|' जो कोणी स्वतःला या माता भारती चा पुत्र समजतो तो तो हिंदू आहे. हीच पवित्र, जाणीव आजवर या सिंधुस्थानाला एकत्र बांधून आहे व याच विचारसरणीला धरूनच आपल्याला आपले स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या, जाचक परकिय आक्रमणांपासून निभावून नेता येईल अन्यथा नाही.


जसा देव, तसाच देश! जसा धर्म, तसेच राज्य! स्वराज्य स्थापन केल्याशिवाय काही आपल्याला निश्चिंतपणे स्वधर्माचे पालन करता येणार नाही. म्हणून राज्य हे स्वराज्यच असावे, हेच आपले वेद सांगतात, आपली पुराणे हाच इतिहास टाहो फोडून गातात, हाच ऐश्वर्ययोग आपल्याला शास्त्रांमधून शिकवला आहे.


सिंधुस्थानाचा इतिहास चाळला तर असा विचार येतो की कदाचित हिंदूंची एकराष्ट्रीयत्वाची भावना अधिक दृढ होण्यासाठीच की काय परचक्र सिंधुस्थानाच्या उत्तर दरवाजावर घोंघावू लागले. एकदा, दोनदा नाही तर शेकडो वेळा म्लेंछांनी म्हणजे परकियांनी भारतावर ले व प्रत्येक पराभवानंतर ही सिंधुभूमी पुनःश्च पूर्वीपेक्षा अपमाने प्रतिकारासाठी सज्ज होऊन उभी राहिली. हाच सोनेरी इतिहास आपण थोडक्यात पाहू.


सोनेरी? होय, सुवर्णमयी इतिहास ! इंग्रजांच्या कृपाशिर्वादामूळे आपल्यापैकी कित्येक हिंदू आपला सुवर्ण इतिहास विसरले, परंतु तो खऱ्या हिंदू राष्ट्रवाद्यांनी तो आपल्या हृदयात कोरून ठेवला आहे. बलाढ्य मेसेडोनियन आक्रमणकर्ता अलेक्झांडरला त्याच्या सैन्यासह चित केले ते एका चंद्रगुप्त-चाणक्य या गुरूशिष्यांच्या जोडीने ! हे आपल्या अर्वाचीन इतिहासातील पहिले सोनेरी पान ! पुढे अशोकाने बुद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर भारतात नपुंसकता वाढीस लागली हे पाहून यवनांनी पुनःश्च आक्रमण केले , तेव्हा सिंधुस्थानातील अन्य हिंदू राजांचे समर्थन मिळवून, नपुंसक मगधेश अशोकपुत्राचा वध करून, मगधाचा राज्यकारभार आपल्या विवेकी, संयमी, तेजस्वी हातात घेऊन आततायी यवनांना मगधापर्यंत अडवून धरणारा आमचा हिंदू मगधसम्राट पुष्यमित्र ! पुढे शक-कुशाणांच्या टोळीच्या टोळी रानटी टोळधाडींप्रमाधे उत्तरेत हिंदवी रक्ताची होळी खेळू लागल्या, तेव्हा त्यांनादेखील दंडकारण्यापर्यंत पोचण्यापासून थोपवून धरले ते आपल्या पाटलीपूत्रातील गुप्त वंशाच्या सम्राट दुसरा चंद्रगुप्त म्हणजेच सम्राट विक्रमादित्य याने ! हा शक-हूणांच्या मर्दनाचा इतिहास म्हणजे आपल्या इतिहासातील तिसरे सोनेरी पान ! पुढे पुन्हा कित्येक वर्षे शांततेचा उपभोग घेतल्यानंतर एकाएकी शक-कुशाणांप्रमाणेच रानटी, क्रूर हूणांच्या धाडीवर धाडी आर्यांच्या पवित्र प्रदेशात मुसंडी मारू लागल्या. उत्तरेचा बहुत भाग या हूणांनी व्यापल्यावर भारतभूमीचा कोणी वाली राहिला नाही अशी अवस्था बनल्यावर या सिंधू रक्षणार्थ धावला तो मालव प्रांताचा हिंदू राजा यशोधर्मा ! अन्य हिंदू राजांच्या सहमतीने त्यांचे नेतृत्व स्विकारून सम्राट यशोधर्म्याने हूणांचा नायनाट केला. हे होते आपल्या इतिहासाचे चवथे सोनेरी पान !


पुढील पाचवे सोनेरी पान फार प्रदिर्घ असून आत्मसंरक्षणासाठी दिलेल्या झुंजीची एक महान गाथाच आहे. या यज्ञात कितीतरी आहुती दिल्या गेल्या, जितक्या आहुती दिल्या गेल्या तितक्याच  हिंदूराष्ट्रभक्तांच्या पवित्र रक्ताचे हविर्द्रव्य यात समर्पित झाले. परंतु अंततोगत्वा हा यज्ञ 'हिंदूपदपादशाही'चे व्रत घेतलेल्या दिक्षित मराठा ब्राह्मणांकरवी पूर्ण झाला. होय आम्ही त्या अरबी, पठाणी, इराणी, मुघल, तुर्की, निजामी मुसलमानांशी आपल्या पूर्वजांनी केलेल्या धार्मिक युद्धाचीच गोष्ट करत आहोत. या सिंधूराष्ट्राला तपश्चर्येच्या अग्नीत नियतीने झोकून देऊन प्रथम आहुती स्विकारली ती सिंध प्रांतातील राजा दाहिर याच्या हस्ते ! त्यानंतर राजा जयपाल-अनंगपाल, पुढे सोमनाथावर जेव्हा धर्मांध आक्रमणे झाली, तेव्हा तर सबंध गुजरात-सौराष्ट्रातील हजारो-लाखो हिंदू वीरांनी स्वतःला या पवित्र यज्ञात हविर्द्रव्य म्हणून समर्पित केले की जेणेकरून यज्ञातील देशभक्तिरूपी अग्नीपुरूष अधिक प्रज्वलित झाला. पुढे पृथ्वीराज चौहान या रजपूत राजाने मोहम्मद घोरी व त्याच्या सैन्याच्या अनेकदा दिलेल्या आहुत्या, पुढे चित्तोडची राणी करुणादेवी, देवगिरीचा राजा रामदेवराय, रतनभोरचे रजपूत राजे, चित्तोडची राणी पद्मिनी यांनी अल्लाउद्दीन खिलजीविरुद्ध झुंजत स्वतः अर्घ्य होऊन या यज्ञात आत्मार्पण केले, कालांतराने मूळ हिंदू असलेले नसिरुद्दिन व देवलदेवी यांनी तर २ वर्षासाठी का होईना पण हिंदू राजवट पून्हा स्थापन केली पण इतर हिंदू राजांच्या राजद्रोहामुळे हा यज्ञ अपूर्ण राहिला आणि या धर्मरक्षकांनी आपल्या  तेजाचे हविर्द्रव्य स्वातंत्र्याच्या पवित्र यज्ञात अर्पिले,  पूढे रजपूत राजे राणा कुंभ, राणा संग, राणा उदयसिंग, महाराणा प्रताप यांनी प्रयत्नांची शिकस्त करून हिंदुत्वाचा यज्ञाग्नी आपल्या हविर्द्रव्याने नित्य तेवत ठेवला. त्याच समयी विजयनगरमध्ये नृसिंहोपासक हरिहर-बुक्क यांनी बळकट हिंदवी राज्य स्थापले. याच विजयनगरने पुढे राजा कृष्णदेवराय, राजा रामराय सारखे वीरोत्तम, धर्मधुरंधर जन्माला घातले, त्यांनी प्राणज्योत मालवेस्तोवर कितीतरी मुसंड्यांच्या आहुत्या देत यज्ञाग्नी धगधगता ठेवला. पुढे दख्खनच्या पवित्र भूमीत जेथे राजा राममदेवरायाच्या कालावधीपासून सतत संतांची मांदियाळी अवतरत राहिली, त्याच धर्मभूमीमध्ये राजा शिवाजी साक्षात शिवाचा सजीव पुतळा अवतरित झाला. 'परित्राणाय साधूनाम् | विनाशाय च दुष्कृताम् |' हे भगवत वचन सार्थ करण्यासाठी! निजामशाही, कुतुबशाही, दिल्लीचे मुघल यांना शिवाजी व शिवाजीनंतर महराष्ट्राचे पंतप्रधान थोरले बाजीराव, माधवराव, नाना-भाऊ पेशवे यांनी व यांच्या अनेकोनेक मातब्बर मराठीसरदारांनी जेरीस आणले व नाममात्र सुलतान बनवून ठेवले. पुनः हिंदवी स्वराज्य स्थापले ते अगदी अटकेपर्यंत ! समकालीन रजपूत राजा छत्रसाल यानेही या यज्ञात कित्येक आहुत्या देत व स्वतःचे रक्त हविर्द्रव्य म्हणून अर्पून आपले योगदान दिले. हे होते ते इतिहासाचे प्रदिर्घ पाचवे सोनेरी पान ! यानंतर सिंधुस्थानाला सामना करावा लागला तो इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगाल राजवटींचा! खरंच वाटते भगंवताला सबंध भारतवासीयांचीच परिक्षा घ्यावयाची होती की काय, म्हणून स्वातंत्र्याच्या यज्ञात कित्येक राजांनी हविर्द्रव्य अर्पिले असूनही यज्ञदेवता प्रसन्न झाली नाही, त्यासाठी प्रत्येक हिंदूकडून आहुत्या व स्वतःचे प्राणार्पण अपेक्षित होते. इंग्रज आणि पोर्तुगीजांविरुद्धच्या या संघर्षात प्रत्येक भारतीय रजपूत योद्धा होऊन तर कधी प्रत्यक्ष भगवान नृसिंह होऊन लढला आणि अडिचशे वर्षांच्या प्रदिर्घ संघर्षानंतर भरतभूमीने मुक्तीचा सूर्य पाहिला. हे होते हिंदुस्थानच्या अर्वाचीन इतिहासातले सहावे सोनरी पान !


आपण पाहिलेत , कसे एका राष्ट्रियत्वाच्या भावनेने आपले भिन्न-भिन्न जाती-धर्माचे, वंशाचे, घराण्याचे पूर्वज एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेने जगले आणि दुसऱ्या बांधवांचे दुःख कमी व्हावे म्हणून नेहमी स्वतः लढून एकतर शत्रूचा बळी घेतला किंवा स्वतः स्वातंत्र्याच्या प्रज्वलित अग्नीत उडी घेतली. हे सारे घडले ते केवळ 'हिंदुइझम्' या एका शब्दाने अभिप्रेत होणाऱ्या हिंदू वैदिक धर्मासाठी नव्हे, तर हिंदुस्थानच्या संस्कृतीचे ऐक्य, सुखी नागरी जीवन अखंड टिकवून ठेवता यावे यासाठी, हिंदुस्थानचे वैभव, मान-मर्यादा तशीच टिकून रहावी याकरता ! अहो जो या मातीला आपली आई मानत नाही तो काय अभय देणार येथील संस्कृतीला, येथील प्रजेला ! जेथे आत्मीयता नाही, तेथे लुटालूटचीच भावना उत्पन्न होणार व बळावणार ! म्हणूनच जो जो या भारती मातेला आपली जननी मानून या मातेसाठी व तिच्या निरागस पौत्रांसाठीतळमळतो, तो हिंदू! हा आमचा बाणा म्हणजे हिंदुत्व ! भारतात राहून तालिबानशी आपलेपणा म्हणजे मानवतेशी शत्रूता बाळगणाऱ्याला आम्ही हिंदू म्हणवून घेणार नाही, भले तो कोणत्याही जाती, धर्म, वंश , घराण्याचा का असेना !

संदर्भ ग्रंथ : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व आणि सहा सोनेरी पाने

Saturday 7 December 2013

एकच ध्येय, एकच राष्ट्र आणि एकच नियम


मागील लेखात आपण हिंदुत्व आणि हिंदू धर्म या संकल्पनांमधील अंतर पाहिले. आज आपण आर्यांची हिंदुत्वाची संकल्पना विस्ताराने पाहू. हिंदुत्वाचे वैशिष्ट्य तिच्या उदयाच्या पवित्र प्रयोजनातच दडलेले आहे आणि ते पवित्र प्रयोजन म्हणजे 'एकच राष्ट्र, एकच ध्येय, एकच नियम!


कोणतीही संस्कृती उदयास येण्यापूर्वीच हे आर्य सिंधू नदिच्या खोऱ्यात वसाहत करून रहात होते. ते कोठून आले, केव्हा आले या प्रश्नांपेक्षाही या सत्याला महत्त्व आहे की त्यांनी सबंध जगापासून दूर असलेल्या या भूखंडालाच आपलेसे मानले व येथेच त्यांनी आपला यज्ञाग्नी प्रज्वलित करून येथील शांत वातावरणात आत्मोद्धाराचा अभ्यास सुरू केला. अतुल्य सामर्थ्य, अपरिमित बुद्धिमत्ता व अचाट आत्मशक्तीच्या बळावर आर्यांनी परब्रह्माला आपलेसे केले. या संपूर्ण वैभलाचा उपयोग त्यांनी एक अशी संस्कृती उभारण्यास केला की ज्या संस्कृतीसाठी लौकिक व पारलौकिक उद्धाराशिवाय जगण्याचा दुसरा हेतूच नाही. आर्यांची हा निर्णय कोणी एकट्याने केलेला नव्हता तर ते मूळातच एकाच ध्येयाने, एकाच आत्मप्रेरणेने प्रेरित झालेले असल्याने सर्वांनी एकमताने एक राष्ट्र, एक व्यक्ती व एकच नियमाचे अनुशासन अवलंबिण्याचा निर्णय घेतला.


एकाच देहाच्या अवयवांमध्ये जे सहज प्रेम असते, कारण अवयव वेगवेगळे असलेतरी जीव एकच असतो. याच तत्त्वावर आधारित ही संस्कृती आहे. एक संयुक्त राष्ट्र, एक संयुक्त समाजपुरूष आणि एकच संयुक्त नियम हेच हिंदुस्थानीना वर्षानुवर्षे एका सूत्रात बांधून आहे. या एकाच ध्येयायाठी आपले पूर्वज जीवन जगले व याच ध्येयासाठी आपण जीवन जगणे श्रेयस आहे. का? तर हाच परमात्याचाच संकल्प आहे,'मी एक आहे, मी अनेक रूपांत प्रकट व्हावे'. पहा हा एकजीवत्वाचा व अनेक होऊन एकच कार्य उभारण्याचा संकल्प देवाचाच आहे. शिवाय इतिहास चाळला तर हेच समजते की याच मार्गाने प्रशस्त जीवन जगता येते आणि सर्वांना हितकर हाच एक मार्ग आहे. याच एका ध्येयामुळे विभिन्न संप्रदायही एकाच देेशात गुण्यागोविंदाने नांदू शकतात. पण ध्येयच जर एक नसेल तर संप्रदाय एक असूनही एकत्र राहता येत नाही याला इतिहास साक्षी आहे.


अखंड समाजाला एकजीवित्वाकडे नेणाऱ्या सर्व गोष्टी हिंदुत्वात मोडतात. पण हे एकजीवित्व काही बळाने साकारता येत नाही. काही संप्रदाय अन्य धर्मीयांच्या जीवावरच उठलेले आहेत. 'धर्म बदल नाही तर मरणाला सामोरं जा', असा पवित्रा घेऊन जगात अराजकता पसरवत आहेत. पण त्यांना हे ठाऊकच नाही कि दोन देहांत राहूनही एकजीव होता येतं की आणि दोन वेगवेगळ्या रूढी - परंपरांच्या पार्श्वभूमीवरदेखील एकजीवत्व टिकवता येते. गरज असते ती एका ध्येयाची. इतिहास साक्षी आहे की काळाच्या ओघात याच संस्कृतीनेे अत्यंत बिकट अवस्थेतही तग धरून राहण्याचे कौशल्य दाखवलेले आहे. त्याचे कारण या हिंदुत्वाच्या एकराष्ट्रियत्वाच्या, एकजीवित्वाच्या तत्त्वांमध्येच आहे. हे हिंदुत्व जोपासणं हेच आपले परमध्येय आहे.


जय श्रीराम|

जय मॉ भारती|

संदर्भ : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'हिंदुत्व'

हिंदूंचे आंतरराष्ट्रीय जीवन


हिंदू राष्ट्र फार पूर्वीपासून विश्वपटलावर एका दैदिप्यमानसूर्याप्रमाणे आत्मतेजाने तळपत होते. भूमार्गे, समुद्रमार्गे दूरदूरच्या देशांबरोबर देवाण-घेवाणीचे व्यवहार सुरू होते. इजिप्तसारख्या राष्ट्रामध्ये फार अलीकडच्या काळापर्यंत चांगल्या कापडाला सिंधू म्हणून ओळखले जात असे. कारण लक्षात येते की आपल्या देशातून फार पूर्वीपासून चांगले कापड बाहेर निर्यात होत असे. जूना पत्रव्यवहार पाहिला तर लक्षात येते कि फार पूर्वीपासून आपल्या देशाला ‘सिंधू’, ‘हिंदू’, ‘इंडस्’, ‘शिन्सू’ असे संबोधले जात असे. काही आंतरराष्ट्रीय मतभेदही होते. पण ते मतभेद कधी दुसऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याइतपत टोकाला गेले नव्हते. सहिष्णूता सहजच सर्वांच्या ठायी होती. कोठवर?  बौद्ध धर्माच्या उदयापर्यंतच! नंतर परिस्थिती टोकाला गेली. म्हणूनच हिंदूंच्या आंतरराष्ट्रीय जीवनाचा विचार करताना बौद्ध धर्माची या देशाच्या इतिहासातील भूमिका यावर विचार करणे आवश्यक ठरते. कित्येक इतिहासकारांनी यावर आपली मते मांडली आहेत. आपण येथे पाहू कि सावरकर या विषयावर आपल्याला काय सांगत आहेत.


बौद्धधर्माच्या उदयानंतर बौद्ध भिक्षूंच्या यात्रा सतत अन्य देशांमध्ये होत असत. त्यांची विद्वत्ता, वैराग्याचे विचार, अहिंसा व विश्वबंधुत्वसारख्या उदार मतांचे अवलंबन यामुळे हा धर्म सहजच जगाचे आकर्षणकेंद्र बनला. सहजच बौद्ध धर्मापाठोपाठ हिंदूराष्ट्रही सर्वांच्या कौतुकाचे केंद्र बनले. म्हणूनच असे म्हणता येते की बौद्ध धर्म कळत-नकळत आपल्या हिंदूराष्ट्राला जगात एक आकर्षणबिंदू बनवण्यास कारणीभूत ठरला. असो. पण बौद्ध धर्माच्या विश्वबंधुत्वाचा फायदा ज्ञानी, गरजू व विवेकी लोकांना होण्याऐवजी  अज्ञानी, आळशी व स्वार्थी लोकांनाच झाला; कारण त्याकाळी बौद्ध धर्माची दिक्षा घेऊन भिक्षू झाल्यास तशा लोकांना बौद्ध विहारांतून, मठांतून मोफत राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय करून दिली जात असे. साहजिकच कर्माला अशाने गौणत्व येऊन अनाचार, कर्मशून्यतेची वृत्ती सर्व बौद्ध भिक्षूंमध्ये पसरली. याशिवाय अशी मोफत खाण्या-पिण्याची व राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी अर्थातच बौद्धभिक्षू राजाश्रय शोधत असत व जेथे राजा अशा अनाचाराला प्रोत्साहन व समर्थन देईल तेथे ते मठ-विहार बांधून राजावर सर्व भार टाकून देत असत. साहजिकच वैदिक संस्कारात वाढलेल्या बहुसंख्य राजांना हे कालांतराने अशक्य आणि अव्यवहारिक आहे याची जाणीव झाली व त्यांनी बौद्ध धर्माला दिलेला पाठिंबा काढून घेतला. हेच कारण झाले बौद्ध भिक्षूंच्या मनात हिंदू राजांविषयी अनास्था निर्माण होण्याचे.


गोष्ट एवढ्यावरच संपली असती व कर्मशून्य झालेल्या बौद्ध भिक्षूंनी आपल्यास अनुकूल प्रदेश शोधला असता तरी भागले असते; परंतु तसे झाले नाही. त्याउलट बौद्ध भिक्षूंनी पूढे झालेल्या परकिय आक्रमणांमध्ये हिंदू राष्ट्राशी दगा करून परकिय आक्रमकांना समर्थन दिले. कशासाठी? तर केवळ राजाश्रय मिळावा आणि असहकार करणाऱ्या हिंदू राष्ट्रांना अद्दल घडवावी म्हणून! पण परिणाम काय झाला? हिंदू राष्ट्रांवर २००० वर्षांपर्यंत भरून न निघणारे संकट ओढवले. एवढेच नाही तर परकिय राष्ट्रांनी केलेल्या आक्रमणांमध्ये हिंदूस्थानी वैदिक समाजापेक्षाही बौद्ध भिक्षूंची निर्दयी कत्तल केली. जे हिंदू बौद्ध राष्ट्रे होती त्यांची काय दशा झाली? बौद्ध धर्मातील अहिंसा तत्त्वाचा नीट अर्थ न समजता विपरीत अर्थ लावल्याने ती राष्ट्रे युद्धाशिवायच परकिय राष्ट्रांच्या पाशवी आक्रमणांत नामशेष झाली. यामुळेच बौद्धांनी जाणलेले आणि आत्मसात केलेले अहिंसेचे तत्त्वज्ञान किती पोकळ आहे हे सगळ्यांना समजून चुकले. नरभक्षी वाघासमोर काय अहिंसा दाखवणार? माणसाने कमीत कमी दुसऱ्या माणसाशी तरी माणसाप्रमाणे वागावे ही साधी समज ज्यांच्या वंशात कोणालाच नव्हती, त्यांना कोणत्या अहिंसेने खूष ठेवता येईल? हे न समजून घेता सत्ता कोणाचीही असो पण आमच्याच धर्माला राजाश्रय मिळायला हवा, असा निराधार आणि अव्यवहारिक हट्ट या बौद्ध भिक्षूंनी धरला, त्यामुळे बौद्ध धर्माची विश्वव्यापक उदार तत्त्वे बाजूलाच राहून या धर्माचे अनुयायी हिंदूमत्सरी, हिंदूराष्ट्रद्रोही, आततायी, सुखलोलुप, ज्ञानविहिन बनते झाले.


वर सांगितलेल्या व याहूनही अन्य बहुत कारणामुळे बौद्ध धर्माचे मूळ शांतीचे तत्त्व बाजूला राहून हा धर्म हिंदूस्थानातील जनमानसातून लोप पावू लागला. खरे तर आजही बौद्धांना हिंदू राष्ट्रांत भय मानण्याचे व परकियांना आमंत्रित करण्याचे आत्महननी कार्य न करता हिंदूंच्या सहिष्णूतेच्या वृक्षातळी निवांत आपला निर्वाणाचा अभ्यास करायला हरकत नाही. पण आसक्ती जशी कालांतराने वृत्ती बनते , तशी हिंदूराष्ट्रातील लोक असहिष्णू आहेत अशी ओरड करण्याची या लोकांची वृत्तीच बनली आहे. द्रोह स्वकियांनी केला तर तो स्वकिय आपण परकियच समजतो. भिन्न भिन्न राष्ट्रे शेजारी शेजारी गुण्या-गोविंदाने नांदू शकतात हे आशिया खंडातील अतिप्राचीन संस्कृतींनी दाखवून दिले आहे. शिवाय राजाश्रयाचा हव्यास न धरताही विभिन्न संस्कृती एकाच राष्ट्रात नांदू शकतात, हे हिंदूस्थानातच घडले आहे. पण मूळातच संबंध ईर्षा, स्वार्थ, मत्सराने लिप्त असेल तर द्रोह ही सहज प्रवृत्ती होते, हे इतिहासावरून ध्यानात येते.


आंतरराष्ट्रीय व्यवहारात नेहमी अग्रेसर असणारा हिंदू उत्तरेला अटक आणि दक्षिणेला समुद्र यांच्या मर्यादेत कसा सापडला? त्याला जबाबदार ठरली मुस्लिम व इंग्रज, तुर्की, पोर्तुगीजांची धर्माक्रमणे! ग्रीक, हूण, शक-कुशाण यांची आक्रमणे आणि तदनंतर झालेली म्लेंछ मुसलमान व पाश्चात्यांची आक्रमणे यांतील महत्त्वाचा फरक म्हणजे मुसलमान आणि इंग्रजादि पाश्चात्यांनी हिंदुस्थानातील प्रजेचे बलात्काराने धर्मपरिवर्तन केले. धर्मपरिवर्तन हे असे अस्त्र मुसलमान आणि इंग्रजांनी वापरले कि ज्यामुळे त्यांचा सामना करणे दुष्कर होऊन बसले व वाळवी लागलेल्या लाकडाप्रमाणे भरतभूमी आतून पोखरून निघू लागली. धर्मपरिवर्तन हे श्रद्धापरिवर्तन, आस्थापरिवर्तन आणि मातृभूमीपरिवर्तन ठरते, म्हणूनच ते आधिक घातकी ठरते. हिंदूंचे होणारे सततचे बलात्कारित धर्मपरिवर्तन थांबवण्यासाठीच आपल्या पूर्वजांनी धर्मदंडाचा वापर केला, कारण अटकेपलीकडचा प्रदेश हा मुसलमानव्याप्त झाला होता आणि भारताचा पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश इंग्रजादि पाश्चात्यांनी व्यापलेला होता. याची जाणीव न ठेवता तथाकथित सुशिक्षितांनी तत्कालीन धर्मरक्षकांवर धर्मांधतेचा आरोप लावून मनुस्मृती सारखा पवित्र ग्रंथ जाळण्याचे लाजिरवाणे कृत्य केले. असो! कर्मगती त्यांना योग्य ते उत्तर देईलच. बौद्ध कालापासून सुरू झालेल्या आक्रमणांचा व त्याविरुद्ध दिलेल्या झुंजीचा हा हिंदुत्वाच्या विजयाने झगमगणारा सोनेरी इतिहास वारंवार लिहावाव वारंवार गावा असाच आहे. असा आपला तेजस्वी इतिहास आपण पुढिल लेखात पाहू. तोवर जय श्रीराम |

संदर्भ : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'हिंदुत्व'

Thursday 14 November 2013

हिंदुत्व आणि हिंदू धर्म


स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्व आणि हिंदूंचा सोनेरी इतिहास यावर उदंड ग्रंथसंपदा लिहिली आहे. त्यांचा शब्द न् शब्द स्वतःच्या मातृभूमीबद्दलच्या आणि आर्यांच्या, आर्य सनातन वैदिक हिंदू संस्कृतीच्या अभिमानाने ओतप्रोत आहे. त्यांच्याच हिंदुत्व या ग्रंथावर आपण चिंतन सुरू करत आहोत.


हिंदुत्व आणि हिंदू धर्म यांतील अंतर:


हिंदू धर्म या संकल्पनेच्या उदयापूर्वीपासूनच हिंदुत्व ही संकल्पना अस्तित्वात होती. कारण माणसा-माणसांमध्ये धर्म  वेगळा असू शकतो अशी कल्पनाच आर्यावर्तात नव्हती. स्मृतितीत काळ आहे तो जेव्हा आपले आर्य म्हणवून घेणारे पूर्वज सिंधू नदीच्या उपजाऊ प्रदेशात शेती करून राहत होते. त्यातील काही विद्वान प्रगल्भ विचारशक्तीच्या बळावर आत्मस्फुर्त वेदांचा अभ्यास करत होते. स्वतःला उलगडलेले विश्वाचे, स्वतःच्या अस्तित्वाचे कोडे सामान्य प्रापंचिक लोकांना उलगडून देऊन त्यांनाही जीवन जगण्याचा स्वधर्म,  स्वकर्तव्यरूपी प्रशस्त मार्ग शिकवत होते. आर्यावर्तातील सातही नद्यांमुळे बहरलेली ही आर्य संस्कृती स्वतःला या नद्यांच्या कृतज्ञतेपोटी 'सप्तसिंधू' म्हणवून घेण्यात धन्यता मानू लागली. तेच अभिधान त्यांनी धारण केले, खरं तर बाहेरील संस्कृतींनाही त्यांना याच नावाने संबोधणे सोयीचे वाटू लागले. तीच त्यांची ओळख होऊन राहिली.


कधी 'सप्तसिंधू' तर कधी 'हप्तहिंदू', कधी फक्त 'सिंधू', तर बहुधा 'हिंदू'च नावाने ओळखले जाणारे ते आर्यच होते. 'सप्तसिंधू' हे जुने नाव थोडा वेळ बाजूला ठेवून आपण आताचे प्रचलित 'हिंदू' हेच नाव ग्राह्य धरू. आपली प्रदेशावरून लोक ओळखण्याची सवय अजून गेली नाही. पहा ना आपण आजही कोकणी, खानदेशी, मालवणी इ. संबोधनेच वापरतो. तसेच हे नाव हिंदू. पण तीच आपली ओळख आहे आणि त्याच नावाने ओळखले जाणारे कितीतरी देवपुरुष येथे होऊन गेले, म्हणूनच या नावाचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. आम्हीदेखील त्या देवतुल्य पुरुषांप्रमाणे होऊन जावे म्हणूनच त्यांची ओळख तीच आमची ओळख व्हावी हाच आमचा लोभ आहे आणि त्यांच्या चरित्राचे आम्हाला पडलेले वळणच आम्ही 'हिंदुत्व' म्हणून मिरवतो. इतर संस्कृतींच्या आक्रमणानंतर उलट हिंदू धर्म ही संकल्पना अधिकच जोर धरू लागली कारण धर्माचा संप्रदाय म्हणून अर्थ हिंदूच्या मनात कधीच नव्हता, पण इतरांनीच आम्हाला हिंदू धर्मीय म्हणून ओळखायला सुरूवात केली . पण त्याचा परिणाम असा झाला की याच हिंदूंचे एका हिंदू राष्ट्रावरील प्रेम कमी झाले कारण आपण हिंदुस्थानी आहोत हा अभिमान येथील लोकांना बांधून होता आज त्या अभिमानाच्या अभावी प्रजेला नपुंसकत्व आले आहे. खरे तर हिंदुस्थानीच्या जागी हिंदू धर्मी म्हटलं तर काय बिघडलं? त्यात काही वावगं नाही. शिवाय तसे संबोधल्याने बंधुंनो आपल्याला सांप्रदायिकता अथवा पाशवीपणा लिंपणार नाही. हिंदू या नावातच सहिष्णूता आहे, प्रेम आहे, विश्वबंधुत्व आहे, एकत्वाचा सुगंध आहे. तेव्हा अभिमानाने सांगा, 'मी हिंदू आहे, मी हिंदुस्थानी आहे.'


आता हे हिंदुत्व म्हणजे हिंदूपणा नेमका कसा आहे हे पुढच्या लेखात पाहू.
संदर्भ : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'हिंदुत्व'

Monday 11 November 2013

नेहमी बुद्धिचे ऐकावे, मनाचे नाही


बद्ध मनुष्य जीवनात सर्रास मनाचेच म्हणणे ऐकतो व नेहमी तोंडावरच आपटतो. पण त्याची त्याला काही खंत नसते, कारण अज्ञान! ज्ञानही कोणते ऐकावे, कोणते नाही, त्यालाही काही शास्त्र आहे. शास्त्र म्हणजे साधा शहाणपणा आपण म्हणू शकतो. पण अज्ञानाला नेहमी चुकिच्याच जाणीवा होऊन मनुष्याचे निर्णय नेहमीच चुकतात. याला ज्ञान घेणे हा एकमेव उपाय आहे.


पण शस्त्र नुसते जवळ बाळगून भागत नाही, तर त्याचा प्रयोग योग्य समयी करावा लागतो. तरच त्या शस्त्राचे असणे सार्थकी लागते. त्याप्रमाणेच ज्ञानही निव्वळ बुद्धीत किंवा पुस्तकांच्या कपाटात असून उपयोगाचे नाही तर त्याचा उपयोगही करणे आवश्यक आहे. हे सर्वांना माहित असले तरी फार क्वचितच माणसे बुद्धीचा उपयोग करतात. इतर मात्र सहजच मनोरथ पूर्ण करून मोकळे होतात. साधकांनी हे प्रयत्नपूर्वक टाळावे. मनाचे म्हणणे ऐकून मनोरथ पूर्ण करणे हे बद्धाचे लक्षण आहे, तर आत्मतत्त्वाच्या अत्यंत निकट असणाऱ्या बुद्धीचे वचन ऐकून ज्ञानोचित निर्णय घेणे हे साधकाचे लक्षण आहे. साधनकाळात प्रथम बुद्धीला ज्ञान उमजते, पण त्या ज्ञानाची परिणती अनुभवात झाली नाही तर ते ज्ञान पोकळच राहते, म्हणूनच बुद्धीचा प्रयोग करायला करा. याच मार्गाने जाऊन बुद्धीच्या पलीकडील ते आत्मतत्त्व अनुभवता येते.

Saturday 26 October 2013

Symbolic tortoise in temples...

If I ask you to describe any of your favourite temple, what you will recall first? The symbolic statue of tortoise at the entrance facing idol of deity of temple.
Have you ever wondered why tortoise is placed at the entrance of temple and why do we pay reverence to this tortoise first even before our Ishwar?


Its an indication of the tendency and the notion that we should bear not just while entering a temple, but throughout our life. So what is that tendency and notion? The tortoise facing idol of deity motivates us to advance towards the state of Ishwar from that of human and like a tortoise who draws its limbs inside its shell, we should protect ourselves from evil tendencies in society and by withdrawing our attention from all hurdles like worldly emotions viz. pleasures, sorrows, envy etc., we need to be focused in our journey to Ishwar. Dear all, divine path to Ishwar is not easy. There are many pleasant or unpleasant hurdles in this way. Only by withdrawing our attention and interest from all obstacles, we can reach to Ishwar. This is the hidden message behind this tradition.
Traditions if followed blindly will prove to be misleading in long run. However if they are followed with open eye, they open the door to Ishwar for us.

Friday 11 October 2013

अवघे धरू सुपंथ...


एकमेकां सहाय्य करू । अवघे धरू सुपंथ ।।


भारतातील सद्यस्थिती पहाता वरील शब्दांचे महत्त्व पटते. कलियुगाची ही मध्यान्हच सुरू आहे. धर्माचा दिवसेंदिवस -हास सुरू आहे. अधर्म माजत आहे. पण धीर धरा. हतबल होऊ नका. कारण पहाटेच्या आधीचा रात्रीचा प्रहर जसा अधिकच काळोखा असतो, तद्वत अधर्म कळस गाठेस्तोवर माजणार आहे. पण एकदा का आपल्या धर्मरूपी रथावर आरूढ होऊन सूर्यनारायण आले की मग पहा कसा अधर्माचा अंधार धर्माच्या तेजापुढे नाहिसा होतो!


पण तोवर आपण काय करावे? तेच जे श्रीरामरायांच्या प्रतिक्षेत माता शबरीने केले, श्रीकृष्णाच्या विरहात गोपींनी केले तेच, आपल्या धर्माचे पालन! धर्मरूपी सुपंथ घट्ट धरून ठेवणे व धर्मालाच आश्रय देणे हेच आता आपले इतिकर्तव्य आहे. धर्म बुडवायला तर नराधम टपलेलेच आहेत, तेव्हा धर्माला व धर्माचे पालन करणा-यांना आश्रय देणे, बहुमत देणे, पाठिंबा देणे हेच आपले कर्तव्य आहे आणि ते आपल्या अवाक्यातही आहे. धर्म ओळखा, धर्मपालकांना ओळखा आणि जोडा, जेवढा धर्म राखता येईल तेवढा राखा. अहो रामाचा सेतू बांधणारे वानर काय शूर होते? पण कार्य श्रीरामांचे होते म्हणून ते सिद्धिस जाणारच होते. तद्वत धर्माची धूरा वाहणारे आपण कोण? पण लक्षात घ्या श्रीरामांच्या कार्यात सहभागी होऊन आपलाच लाभ आहे.


धर्माचे पालन हाच आमचा सुपंथ आणि धर्मपालकांनाच आम्ही सहाय्य करणार! कळत आणि नकळतही! हीच आमची प्रतिज्ञा!

Friday 30 August 2013

ज्ञानियांचे ज्ञेय


ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय ।
पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू ।।
ते हे समचरण उभे विटेवरी ।
पहा भीमातीरी विठ्ठलरूप ।।धृ।।

जे तपस्वियांचे तप, जे जपकांचे जाप्य जे ।
योगियांचे गौप्य परमधाम ।।
जे तेजकांचे तेज जे गुरूमंत्राचे गूज ।
पूजकांचे पूज्य कूलदैवत ।।1।।

जे जीवनाते जीववीते, पवनाते नीववीते ।
जे भक्तांचे उगवीते मायाजाळ ।।
नामा म्हणे ते सुखचि आयते ।
जोडले पुंडलिकाते भाग्य योगे ।।2।।



सूर्याला आपले तेज पसरवण्यासाठी काही धडपड करावी लागत नाही. फुलाला आपला गंध दरवळवण्यासाठी काही श्रम पडत नाही. तेच देवाच्या भक्तांविषयी सांगता येते. त्यांच्या भक्तीचा झरा त्यांच्या विचारांतून, कर्मातून अविरत वाहत असतो. त्या भक्तिझ-याच्या वाटेत येणारे दगडसुद्धा तरतात, पशू-पक्षीदेखील पाण्याशिवायच तृप्त होतात, तर मग मनुष्याच्या सुदैवाची काय महती सांगणार हो! खरंच, अशा पुण्यश्लोकांचे सान्निध्य ज्या कर्मयोग्यांना लाभते ते ही संताप्रमाणेच पूजनीय आहेत.


संत नामदेव म्हणजे त्या विठ्ठलाच्या प्रेमाचा जणू मूर्तीमंत आविष्कार! पहा, प्रेमरूपा भक्तीचा झरा त्यांच्या या अभंगातून कसा खळखळून वाहत आहे! असा विचार मनात येतो न येतो, तोच तो झरा आपल्या मनरूपी मातीला भक्तीने चिंब भिजवून चित्तामध्ये सहजच विठ्ठलरूपाचा ठसा उमटवून तेथेच लुप्त होतो.


संत नामदेव सोबतच्या भक्तगणांना म्हणतात, ‘हरीभक्तांनो पहा, विठ्ठलाच्या या सगुण रूपाने भक्ती कशी सर्वसामान्यांच्या अवाक्यात आली आहे! ए-हवी ज्ञानी लोकांच्या ज्ञानाचा जो विषय, ध्यानस्थ राहणा-या मुनीजनांचे जे ध्यान ते हे विठ्ठलचरण ज्ञानी व ध्यानी मंडळींना चकवून येथे कसे विटेवर उभे आहे! मग आता डोळे बंद करून ध्यान लावायची काय गरज? डोळे उघडून पहा! हे विठ्ठलाचे समचरण येथेच या वाळवंटात समत्वयोगाची शिकवण देत आहेत. ही सारी पुंडलिकाची करणी! स्वतः देवाला येथे विटेवर तिष्ठत ठेऊन त्याने कित्येक पिढ्यांसाठी भक्तीचा देव्हारा खुला करून ठेवला आहे. विठ्ठलरूपात मूर्तीमंत सुखंच भिमातीरी अवतरले आहे.’



‘अहो! प्रपंच्याच्या मायाजाळाला सुख मानून तूम्ही पुरते नागवले गेले आहात. विठ्ठलरूपाला ओळखा! मग कळेल की सुख ते काय! तपस्व्यांचे जे तप, जपमाळा करणा-यांचा जो जपमंत्र, योग सिद्ध केलेल्या योग्यांचे जे गूह्य, तसेच वैकुंठ-गोलोक-साकेतलोक इ. नावाने ओळखले जाणारे जे परमधाम आहे ना, अहो ते हेच विठ्ठलाचे रूप आहे! तेजस्वी म्हणून प्रसिद्ध ज्या ज्या वस्तू आहेत, त्यांचे जे तेज आहे तसेच सद्गुरूचरणी साधना करून शब्दमंत्राच्या परिणामस्वरूप जे शिष्यात संचारते ते निजस्वरूप हेच विठ्ठलरूप आहे! पाण्यामध्ये जीवन होऊन जे वाहते, वायूमध्ये प्राण होऊन जे प्राणीमात्रांना राखते, एवढेच नाही तर शिका-याने टाकलेल्या जाळ्यात पक्ष्यांचा थवाचा थवा अडकावा त्याप्रमाणे मायाजाळात अडकलेल्या भक्तांचे मायाजाळ उठवते ते विठ्ठलरूपच आहे. अजून एक गूढ आहे, हा विठ्ठलच देव होतो आणि भक्तही तोच होतो आणि देव-भक्ताचे प्रेम सा-या जगाला शिकवतो, जसं निवृत्तीनाथही विठ्ठलच आणि ज्ञानदेवही विठ्ठलच! अहो! मग तूम्हीच सांगा, एवढे आयते सुख जर तुमच्या समोर उभे ठाकले आहे, तर ते लुटण्याऐवजी आपण का बरे तुच्छ संसारसुखासाठी जन्म-मृत्यूची वारी करायची? अहो, पंढरीची वारी करा! या विठ्ठलरूपाला आपलेसे करा! याच सुखानंदाशी पुंडलिकाने आपले नाते जोडले आहे. चला आपणही या सुखानंदात डुंबूया! विठ्ठलाची भक्ती करूया!’